Labels

Monday, February 12, 2018

दिव्याचा हव्यास हवा...

आताच एका ग्रुपवर एक पोस्ट वाचली (आजकाल असलेला नव्या content चा अभाव हा विषय). त्यावर काही कमेंट लिहीत होतो पण लिहिता लिहिता फारच मोठी झाली आणि असं लक्षात आलं की कंमेंट पेक्षा स्वतंत्र पोस्ट केलं तर काही उत्तम, नव्या content च्या शोधात असणाऱ्या रसिकांना माझ्या कडे असलेल्या काही संकलनाचा उपयोग होईल, म्हणून वेगळं पोस्ट करतो आहे.

कदाचित पूर्वीइतकी येत नसतील, पण आजही अनेक उत्तमोत्तम गाणी येतात. त्यांना प्रसिद्धी कधी मिळते कधी मिळत नाही. उदाहरणं द्यायची झाली तर सलील कुलकर्णी यांनी मध्यंतरी काही गाणी केली, मीरेवर केलं, कौशिकी चक्रवर्ती आणि महेश काळे यांचं द्वंद्वगीत 'गायेजा' हे काहीशा पाश्चात्य ढंगात केलेलं पण पूर्णपणे शास्त्रीय रागदारीवर आधारित... त्यांनीच संगीतबद्ध केलेली ना. घ. देशपांडे यांची 'तुझ्यासाठी' कविता, त्यांच्या मुलाला घेऊन केलेलं 'दूर कुठेतरी पहाटतो सूर्य' ही सुधीर मोघेंची कविता, १०० गायकांना घेऊन केलेलं 'हे गजवादन' हे गाणं... शिवाय त्यांनी गेल्यावर्षी २५ हून अधिक भागांची कवितेचं गाणं होताना ही अतिशय सुंदर मालिका YouTube वर सादर केली. आता यावर्षी २७ फेब्रुवारी (मराठी भाषा दिन) पासून त्यांचा एक नवीन उपक्रम सुरू होतो आहे ज्यात ते नवीन गायकांचा शोध घेऊन त्यांच्या आवाजात गाणी करणार आहेत. आपण म्हणता त्याप्रमाणे नवीन गायकांना 'स्वतःचं' असं गाणं मिळावं हाच या उपक्रमामागचा हेतू आहे.
अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर या त्यांच्या 'कवितेचं पान' या वेब सीरिजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलतं करून जुन्या नव्या कवितांचा अनौपचारिक कार्यक्रम सादर करतात.
आणखी एक उदाहरण द्यायचं तर YouTube वर 'Dattaprasad Ranade' असा सर्च दिला तर त्यांनी चाली दिलेल्या आणि गायलेल्या अनेक सुंदर हिंदी-मराठी गझला (मिर्झा गालिब पासून वैभव जोशींपर्यंत नव्याजुन्या दोन्ही) ऐकायला मिळतील.
नव्या पिढीचा संगीतकार-गायक जसराज जोशी याने double seat चित्रपटाला फार सुंदर संगीत दिलं होतं, गंधार संगोराम यानेही 'उबंटू' चित्रपटाला असंच अप्रतिम संगीत दिलं होतं. जसराज जोशीनेच ग्रेस यांच्या 'निळाई' आणि अशा अनेक कवितांना अतिशय मधुर अशा चाली दिल्या आहेत (याला आपण हृदयनाथ मंगेशकरांचा वारसा पुढे नेणं नाही म्हणू शकत का ?).
Youtube वरच Spill Poetry सारखे अनेक Channels आहेत जे नवीन कवींना स्वतःच्या कविता सादर करायची संधी देतात.
'आयुष्यावर बोलू काही'ची लोकप्रियता मी वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही.
संगीतकार कौशल इनामदार हेही अनेक नवीन गाणी करत असतात.
'सूर नवा ध्यास नवा' किंवा टीव्हीवरच्या तत्सम कार्यक्रमांना आणि प्रथितयश गायकांच्या जाहीर कार्यक्रमांना जास्त लोकप्रियता मिळत असल्यामुळे आपल्याला Original Content नाही असं वाटतं. शेवटी आपल्या मानण्यावर आणि आपल्या उत्तमोत्तम गोष्टी स्वतः शोधून ते ऐकण्याच्या, पाहण्याच्या इच्छाशक्ती आणि मेहनतीवर अवलंबून आहे. फेसबुक, YouTube, WhatsApp अशा माध्यमांचा उपयोग केवळ Gossiping किंवा भुवया उडवणाऱ्या मुलामुलीचे थिल्लर Video आणि Meme Viral करण्यासाठी करायचा की बा. भ. बोरकर त्यांच्या 'स्वर्ग नको सुरलोक नको' कवितेत म्हणतात त्याप्रमाणे 'दिव्याचा हव्यास हवा'साठी करायचा हे प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवर ठरवावं 😊
इति अलम् 🙏🏼

(आपल्याला माहीत असल्यास आपणही असा नवा कन्टेन्ट सांगावा म्हणजे माझ्याही माहितीत भर पडेल.)

आपल्यासारखाच आपल्यातलाच एक रसिक
कौस्तुभ दीक्षित

Wednesday, February 7, 2018

किल्ला



भव्यतेच्या खुणा अभिमानाने मिरवलेला एक किल्ला
आज भग्नतेचं अस्तित्व नाईलाजाने वागवतो आहे.
इथे वावरलेल्या कुण्या सम्राट/महाराजाच्या जाम्यानिम्याच्या आठवणी घेऊन
आज कुणी येईल म्हणून वाट पाहतो आहे.
की त्याला सांगेन इथलं गतवैभव,
पोवाडे गाईन त्या कोण्या शासकाचे,
इथल्या अभेद्यपणाच्या कथा सांगताना बुरुजावर वाढलेल्या गवताच्या सळसळण्यातून  रोमांचित होईन,
एखादा खडक कोसळल्यावर जणू तोफांचे आवाज कानात घुमतील
इथला कण अन् कण ऐतिहासिक पदस्पर्शाने पुनित होईल,
आणि मी असा माझ्या जीर्ण गात्रांत प्राण फुंकून जगाला ओरडून सांगेन की “होय, हा पहा मी अजूनही काळाचे व्रण मिरवत उभा आहे”....
पण त्या किल्ल्याचं वाट पहाणं काही संपत नाही.
आजही वाट पहात राहतो कुणी येईल याची,
पण इथल्या गावकऱ्यांनाच या किल्ल्याचा इतिहास माहीत नाही !
त्यांना ‘टेकडी’ म्हटल्यावर कळतं, कुणी ‘किल्ला’ म्हटलं की एकमेकांची तोंडं बघत बसतात.
‘अतिपरिचयात् अवज्ञा’ दुसरं काय….
किल्ला आजही वाट बघतो आहे,
पण पुरातत्व विभागाच्या एका जीर्ण पाटीशिवाय त्याच्या नशिबी दखल घेणारं कोणी आज तरी नाहीये.
घोड्यांच्या टापा आणि तोफांच्या कानठळ्या घुमलेल्या इथल्या जमिनीच्या नशिबी आज फक्त गवत-झुडपांची हलकी सळसळ आहे.
युगप्रवर्तक पराक्रमांच्या गाथा कोरलेले स्तंभ-शिलालेख आज कोरीव कामांतून आजच्या काळातल्या प्रेमकथा सांगत आहेत....
कदाचित काही वर्षांनी जमीनदोस्त झाल्यावर पुन्हा कधी उत्खनन झालंच तर इतिहासकार इथल्या पराक्रम आणि प्रेम यांच्या सहअस्तित्वाच्या कथा सांगतील.
मग किल्ला पुन्हा एकदा खिन्न हसेल,
ऊन-पाऊस-वारे-ऋतू झेलत त्याचं वाट पाहणं चालूच राहील,
आणि तिथे काळ नामक कुणी (खल)नायक छद्मी हसेल,
फक्त माणसांनाच नाही, किल्ल्यालाही प्राक्तन असतं...

-कौस्तुभ
४ फेब्रुवारी २०१८



Tuesday, January 2, 2018

श्रीधर फडके - दिव्यत्वाची जेथ प्रचीती

प्रसंग # १ :
स्थळ : शिवाजी पार्क
वर्ष २००५
गीतारामायणाला ५० वर्ष झाल्यानिमित्ताने शिवाजी पार्कात गीतारामायणाचा भव्य कार्यक्रम करण्यात आला होता (गीतरामायण ५० : ज्योतीने तेजाची आरती). या कार्यक्रमात माझी गीतरामायणाशी पहिल्यांदा ओळख झाली. २ दिवस चाललेल्या या कार्यक्रमात अनेक नावाजलेल्या गायकांनी गीत रामायणातली ५६ गाणी सादर केली. या कार्यक्रमाला श्रीधरजी फडके पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी गीत रामायणातलं अतिशय प्रसिद्ध गीत 'माता न तू वैरिणी'. गाणं म्हणजे एखादा कोमल कलाविष्कार अशी समजूत असलेल्या मला त्या गाण्याच्या सादरीकरणाने श्रीधरजींनी तीनताड उडवलं ! कार्यक्रम संपला, पण सर्वात जास्त लक्षात राहिलं ते श्रीधरजींनी सादर केलेलं हेच गाणं !

प्रसंग # २ :
स्थळ : शिवाजी मंदिर, दादर की यशवंत नाट्यमंदिर माटुंगा नक्की आठवत नाही. श्रीधरजींच्या स्वरचित गाण्यांचा कार्यक्रम होता. त्यात त्यांनी सादर केलेली सगळी गाणी माझ्या संग्रही असलेल्या बाबूजींचं आत्मचरित्र 'जगाच्या पाठीवर' या पुस्तकात शेवटच्या पानावर लिहून घेतली. प्रतिभावान वडिलांच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची शैली निर्माण केलेला हा संगीतकार-गायक मृदू आणि सौम्य स्वभावाचा, पण माझ्या बुजऱ्या स्वभावामुळे भेट न घेता परतलो.

प्रसंग #३
स्थळ : शिवाजी मंदिर, दादर
बाबूजी सुधीर फडके यांच्या ११व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्रीधरजी फडके यांच्या कंठातून गीत रामायण ऐकायचा योग २७ आणि २८ जुलैल २०१३ रोजी आला. असा कार्यक्रम होणार आहे याची माहिती असल्यामुळे तिकीटविक्री सुरु होताच लगेच जाऊन तिकीट काढलं. बाबूजींचा प्रत्यक्ष कार्यक्रम बघायला/ऐकायला मिळाला नाही पण श्रीधर फडकेंच्या तोंडून ऐकायची संधी यावेळी होती. कार्यक्रम ऐकताना खरंच बाबूजींचा वारसा पुढे चालवण्याचं शिवधनुष्य श्रीधरजींनी किती समर्थपणे पेललंय ह्याची प्रचीती आली. सुधीर फडकेंनंतर गीत रामायणाचा वारसा पुढे चालवण्याचा वसा कोणी घ्यावा तर श्रीधर फडकेंनीच !!
कार्यक्रम श्रीधरजींकडे गेलो. बाबूजींचं आत्मचरित्र 'जगाच्या पाठीवर' वर मला श्रीधरजींची सही हवी होती. यामुळे यावेळी मात्र त्यांना भेटायला गेलो. त्यांना सही द्यायची विनंती केली. ते म्हणाले, "यात मी सुरुवातीला प्रस्तावना लिहिली आहे त्यावर सही करतो". असं म्हणून त्यांनी स्वतःहून ते पृष्ठ काढलं आणि त्यांच्या नावाखाली स्वाक्षरी केली. आणि अनपेक्षितपणे मला उद्देशून म्हणाले, "अशी तरूण मंडळी येतात कार्यक्रमाला, बरं वाटतं". आयुष्यात काही क्षण किंवा अनुभव सुरेख, अप्रतिम, अविस्मरणीय अशा शब्दांपलीकडचे असतात आणि त्यांची खरी किंमत फक्त तो क्षण अनुभवणाऱ्या त्या व्यक्तीलाच माहीत असते…. अशांपैकी हे क्षण होते. तो मृदू स्वभाव, सौम्य वाणी पुन्हा मनात भरली.... त्यांना चरणस्पर्श करून परतलो... 

प्रसंग #४ :
स्थळ : इंदिरानगर संगीत सभा, बेंगळुरू
पुन्हा एकदा श्रीधरजी फडकेंच्या स्वरचित गाण्यांचा कार्यक्रम... दिनांक : २८ ऑक्टोबर २०१७.
पुन्हा एकदा तसंच भरलेलं सभागृह, भारलेलं वातावरण... श्रीधरजींचा आवाज अप्रतिम लागलेला... एकामागे एक गाणी सादर होत होती. श्रोते अक्षरशः कानात साठवून घेत, टाळ्यांचा कडकडाट करत दाद देत होते. या कार्यक्रमात एक गाणं बेंगळुरूचे श्री. केदार कुलकर्णी यांनी solo सादर केलं. ते सादर करण्याच्या वेळी श्रीधरजींनी त्यांना पुढे बोलावलं आणि स्वतः शांतपणे तबलजींच्या बाजूला जाऊन बसले. गाणं सादर होत असताना स्वतः श्रोत्याच्या भूमिकेत शिरून अतिशय तल्लीन होऊन ठेका धरत होते, एखाद्या जागेला मान हलवून दाद देत होते. आपण एक ज्येष्ठ गायक-संगीतकार आहोत असा आव या प्रसंगीच काय संपूर्ण कार्यक्रमभर कधीच नव्हता. वास्तविक ते इतके थोर कलाकार, स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे चिरंजीव, स्वतः बाबूजी, आशा भोसले, सुरेश वाडकर अशा ज्येष्ठश्रेष्ठ गायकांनी त्यांची गाणी गायलेली... पण या सर्वाचा लवलेशही कुठे नव्हता !! यावेळी काही कामानिमित्त लवकर जायचं असल्यामुळे भेटता आलं नाही.

प्रसंग #५ :
दिनांक : ५ नोव्हेंबर २०१७
इंदिरानगरचा कार्यक्रम झाल्यानंतर फेसबुकवर छोटंसं पोस्ट लिहिलं. त्यात या कार्यक्रमाचा, श्रीधरजींच्या आधी घेतलेल्या भेटीचा उल्लेख केला होता. त्यांच्यातलं मला भावलेलं लिहिलं होतं. हे लेखन माझ्या वॉलवर आणि इतर काही ग्रुप्स वर पोस्ट केलं होतं. त्यापैकी स.न.वि.वि. ग्रुपवरच्या श्री. अजय पुराणिक यांच्यामुळे सुकन्या जोशी यांच्याद्वारे श्रीधरजींपर्यंत पोचलं. त्यांनी स्वतःहून चौकशी केली.

"श्री कौस्तुभ दीक्षित ह्यांनी लिहिलेली  आमच्या बंगळुरू येथे दि 28 ऑक्टोबरला झालेल्या
" फिटे अंधाराचे जाळे " कार्यक्रमावरची प्रतिक्रिया वाचली।

आपण ती सौ सुकन्या जोशी ह्यांना पाठविली व त्यांनी मला पाठविली।

मनःपूर्वक धन्यवाद।

श्री दीक्षित ह्यांचा दूर ध्वनि क्रमांक देऊ शकाल का।

त्यांनाही धन्यवाद द्यायचे आहेत।"

श्री. अजय पुराणिक व सौ. श्रद्धाताई सौदीकर यांच्यामुळे ही गोष्ट मला कळली आणि मी माझा नंबर दिला. अजयजींनी मला श्रीधरजींचा नंबर दिला . धडधडत्या छातीने नंबर सेव्ह केला. त्यानंतर कितीतरी वेळ फोनकडे लक्ष जात होतं. दुसऱ्या दिवशी भूतान ट्रिपसाठी काही खरेदी करायला बाहेर पडलो असता एका दुकानात होतो. अचानक फोन वाजला.... "Shridharji Phadke Calling ...". धडधडत्या छातीने कॉल उचलला. पलीकडून तोच मृदू आवाज कानांवर पडला.
"नमस्कार, मी श्रीधर फडके बोलतोय मुंबईहून. कौस्तुभ दीक्षित का ?"
त्या क्षणाची महती काय वर्णावी देवा... आयुष्यात पूर्वी काहीतरी फार पुण्यकर्म केली असावीत म्हणून त्या वर बसलेल्याने अशा काही क्षणांचं दान आमच्या पारड्यात टाकलं....
"तुम्ही फेसबुकवर लिहिलंत माझ्याबद्दल ते वाचलं. म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला फोन केला. खरंतर मी इतक्या कौतुकाला पात्र आहे की नाही मला माहीत नाही. खूप आभार तुमचे."
"त्यादिवशी भेटायला नाही आलात का ?"
मी : नाही, जरा लगेच जायचं होतं त्यामुळे नाही भेटू शकलो."
"पुढच्या वेळी नक्की या भेटायला."
मी : तुम्हाला काही वर्षांपूर्वी एकदा शिवाजी मंदिरला तुमच्या कार्यक्रमाला भेटलो होतो तेव्हा "जगाच्या पाठीवर" वर तुमची सही घेतली होती."
"ओह, नाही पण मला नाही आठवत हो चेहरा."
मी : "अहो श्रीधरजी, नाही ठीके खूप जुनी गोष्ट आहे."
मग काय करता, कुठे राहता वगैरे चौकशी केली. software engineer म्हटल्यावर 'मीही होतो computer क्षेत्रात' असं सांगितलं आणि  मूळचा मुंबईचा आणि त्यातही माहीम म्हटल्यावर अगदी 'कटारिया रोड का ?' इथपर्यंत सगळं विचारलं. "माझंही घर दादरलाच आहे त्यामुळे मला तो परिसर बराचसा माहीत आहे."
मुंबईला मी २-३ महिन्यांतून एकदा येतो असं सांगितल्यावर "कधी आलात तर नक्की या भेटायला...". अशा प्रसंगी आपल्याकडचे शब्द संपतात आणि केवळ "हो, नक्की" इतकंच तोंडून कसंबसं बाहेर पडतं....
मी शिवाजी पार्कच्या कार्यक्रमापासून गीत रामायण ऐकत असल्याचं आणि कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावसं वाटतं सांगितल्यावर "ती सगळी गदिमा आणि आणि बाबूजींची पुण्याई आहे. त्यांनी कामच तसं करून ठेवलंय."
शेवटी फोन ठेवताना पुन्हा एकदा धन्यवाद... नमस्कार....

मी अजून त्यांच्याबरोबर फोटो काढलेला नाही. पण अनेकदा ऐकलेल्या तृप्त मैफिली, 'जगाच्या पाठीवर'वर त्यांची घेतलेली सही, त्यांना केलेला नमस्कार,"अशी तरूण मंडळी येतात कार्यक्रमाला, बरं वाटतं" हे त्यांचे त्यावेळचे शब्द, आणि आत्ताची ही फोनवरची २ मिनिटं २० सेकंद... एका फोटोपेक्षाही फार मोठी पुंजी आहे... बाबूजी सुधीर फडके माझे सर्वात आवडते संगीतकार आणि गायक... त्यांचे सुपुत्र असलेले स्वतःही ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकार असलेले श्रीधरजी... आमच्या रसिकत्वाच्या चांदण्याला या तेजस्वी सूर्याच्या किरणांचा हा असा सोनसळी अभिषेक एका फोटोच्या फ्लॅशहून जास्त उजळून टाकणारा आहे...

कौस्तुभ दीक्षित
३० डिसेंबर २०१७

Tuesday, April 25, 2017

मेंढरांची सेना चाले

मेंढरांची सेना चाले, मेंढरांची सेना चाले,
एक निघाली मेंढी, मागे मेंढरांची सेना चाले


एक राहायाला, पाठी सगळे कळप आले, मेंढरांची सेना चाले
कूपमंडूक न्यायाने घर हेच सारे जग झाले, मेंढरांची सेना चाले
बाहेर ना राम वाटे, सारे खूपच नीरस झाले, मेंढरांची सेना चाले
विहिरीच्या घनफळी, सागरही रिते झाले, मेंढरांची सेना चाले
कुरणाच्या कुंपणात, वन विसरते झाले, मेंढरांची सेना चाले
पोटासाठी चरायला, मान वाकवते झाले, मेंढरांची सेना चाले
मावळता उजेडाची, आशा वाटेनासे झाले, मेंढरांची सेना चाले
लोकरीच्या उबेसाठी, स्वप्न वाळवंट झाले, मेंढरांची सेना चाले
डोळे झाकून डोळस, एकामागे एक आले, मेंढरांची सेना चाले
कळपात, एकट्याच्या कौशल्याचे शिरकाण झाले, मेंढरांची सेना चाले
आकाशात मेंढपाळ
काठी ठोकत हसत,
बोले, “बुद्धिजीवी पहा कशी
मेंढरांची सेना चाले...”

-कौस्तुभ दीक्षित
२५ एप्रिल, २०१७

Tuesday, April 11, 2017

घेई छंद...

मायदेश आणि संस्कृती यांपासून आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ चार-पाच हजार मैल दूर रहात असताना अधूनमधून होणारे छोटे छोटेसे भेटींचे कार्यक्रम आपल्या भयंकर सांस्कृतिक भुकेला पुरेसे नसतात. त्यासाठी ‘जेवण’ नाही, ‘मेजवानी’चीच आवश्यकता असते (इथे वर्षभराहून अधिक काळ किंवा कायमचे देशाबाहेर असणाऱ्यांना आधी साष्टांग दंडवत !). पुस्तकं नेता येतात किंवा सिनेमे कुठेतरी ऑनलाइन मिळणं कामचलाऊ असतं, पण कार्यक्रम हे प्रत्यक्ष जाऊनच अनुभवावे लागतात. ती अनुभूती लॅपटॉपवर येत नसते. आणि जेव्हा असा एखादा कार्यक्रम असल्याचं कळतं, तेव्हा त्या कार्यक्रमाला न जाणं म्हणजे माझ्यासाठी महापाप ! असाच एक कार्यक्रम लंडन नगरीत होणार असल्याचं कळलं. सादरकर्त्या विभूती म्हणजे साक्षात सुबोध भावे, महेश काळे आणि राहुल देशपांडे असताना जायचं टाळणं म्हणजे श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि वरण-साजूक तूप-मीठ-लिंबू भात यांनी भरलेलं ताट नाकारण्यासारखं झालं असतं आणि ते मी करणं या जन्मात तरी शक्य नव्हतं. त्यामुळे दीड-दोन महिने आधीच तिकीट काढून ठेवलं. अखेर ९ एप्रिलचा तो दिवस उगवला आणि (कधी नव्हे ते) कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेआधी १० मिनिटं अस्मादिक कार्यक्रम स्थळी प्रवेश करते झाले.
कार्यक्रम थोडा उशीराच सुरू झाला. पण जेव्हा सुरू झाला त्या क्षणापासून त्या हॉलपलीकडच्या जगाचं अस्तित्त्व विसरायला झालं. नुकत्याच दिवंगत झालेल्या थोर शास्त्रीय संगीत गायिका किशोरीताई आमोणकर यांच्या सुप्रसिद्ध ‘सहेला रे’ ने झाली आणि त्यानंतर ‘रागमाला’. अखंड त्रेपन्न मिनिटं त्या स्थळी फक्त शुद्ध शास्त्रीय संगीत भरून राहिलं होतं.
किशोरी ताई, अभिषेकी बुवा, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, शांता शेळके, पाडगावकर, विंदा करंदीकर, सुधीर फडके, गुलजार, मेहदी हसन, जगजित सिंग अशांपासून अरिजित सिंग आणि वैभव जोशींपर्यंतचे कित्येक जुने-नवे दिग्गज असे समोर तीन माणसांतून व्यक्त होत असताना समोरच्यांची ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था झाली नसती तरच नवल....
या मेजवानीत पोळीसारखं processed शास्त्रीय संगीत, पहिला भात-मधला भात-ताकभातासारखं नाट्यसंगीत, भाजीसारखं चविष्ट भावसंगीत कोशिंबिरीइतक्या कविता, लोणच्याइतकी तोंडी लावायला इंग्लिश गाणी, पापडासारखी आणि पापडाइतकीच मसालेदार हिंदी गाणी.... अहाहा.... असं खुसखुशीत, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण जेवण तिन्ही कलाकार आम्हाला घ्या-घ्या म्हणून आग्रह करकरून वाढत असताना ते जर आम्ही नाकारत असतो तर आमच्यासारखे कपाळकरंटे आम्हीच ठरलो असतो. आणि शेवटी डेझर्ट्ससाठी कट्यार चित्रपटातल्या गाण्यांच्या थरांचा केक आणि सर्वात शेवटी वर ‘कानडा राजा पंढरीचा’च्या जुगलबंदीची Cherry on the cake... एवढं पोटभर जेवण चारपाच तास जेवल्यावर, एवढं ‘सूरा’पान केल्यावर सुस्ती, धुंदी येणं हे अनिवार्य होतं. घरी परत येताना पाय, ट्रेन, बस वगैरे निमित्तमात्र.... त्या सुरांवरच तरंगणंच खरं !
विशेष उल्लेख नेहमीप्रमाणे ‘मन मंदिरा’ गाण्यात श्रोत्यांना गातं करणं , जिथे श्रोते स्वतः मैफिलीचे सादरकर्ते होतात. हाच momentum पुढे नेत जेव्हा कानडा ‘राजा पंढरीचा’ला जेव्हा “विठ्ठल विठ्ठल” घोषात, टाळ्यांच्या तालावर मैफिलीचा उच्चबिंदू गाठला जातो त्याच बिंदूला ही भरलेली, भारलेली, बहरलेली, रंगलेली मैफिल संपते. पण प्रेक्षक, सादरकर्ते गेल्यानंतरही त्या परदेशातल्या हॉलच्या भिंतीभिंतीत, खुर्चीखुर्चीत आणि मंचावरसुद्धा भारतीय संगीताचा ठसा उमटून राहिला असेल.
घरापासून इतक्या लांब असूनही घराजवळ असण्याची अनुभूती देणारी ही Virtual Reality कुठल्याही तंत्रज्ञानाइतकीच सक्षम होती. आम्हाला घरापासून इतक्या दूरवर ही अनुभूती दिल्याबद्दल ‘घेई छंद’च्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार !!

-कौस्तुभ दीक्षित
१० एप्रिल २०१७